मुंबई : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवरून संपूर्ण देशातील राजकारणच ढवळून निघाले आहे. त्यातही चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसत आहे. एवढंच नाही ते उत्तर प्रदेशनंतर आता राज्यातही भाजपची सत्ता येणार असल्याचे भाजपा नेते देऊ लागले आहेत. भाजपच्या याच दाव्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
नागपुरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह नितीन गडकरी यांनी राज्यात भविष्यात भाजपाची एकहाती सत्ता येईल असा दावा केला. यानंतर शरद पवार यांनी या दाव्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान केलं आहे. विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी काल बैठका झाल्या. सकाळी महाविकास आघाडीचे तरुण आमदार पवार यांना भेटले व सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी पवारांनी युवा आमदारांची मते जाणून घेतली आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी कानमंत्रही दिला.
“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. महत्वाचं म्हणजे भाजपा आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमकपणे उत्तरे देण्याचा निर्णय झाला. मलिक यांच्याकडे सध्या दोन जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद आहे. गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनुपरे यांच्याकडे तर परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मलिक यांच्याकडील कौशल्य विकास खाते राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक खाते हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.