आगरतळा – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी भाजपची सत्ता पुढची 28 वर्षे कायम राहणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. भाजप देशभर पक्ष मजबूत करण्यावर भर देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका जाहीर सभेत बोलताना राम माधव म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे होतील तेव्हा भाजपच सत्तेत असेल. लोकसभा निवडणुकीत त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलत असताना राम माधव यांनी हे विधान केले आहे.
देशामध्ये सगळ्यात जास्त काळ कॉंग्रेस सत्तेत राहिली आहे. 1950 ते 1977 या काळात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली आहे. नरेंद्र मोदी हा रेकॉर्ड मोडतील आणि भाजप हा 2047 पर्यंत सत्तेत राहील, असे राम माधव यांनी या सभेत म्हटले.