लखनौ – देशभर होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागण्या आणि त्याबद्दल नागरिकांमध्ये होत असलेली जनजागृती पाहता भाजपाची झोप उडाली आहे. खरे तर केंद्राने पुढाकार घेत, अशी जनगणना राष्ट्रीय पातळीवर घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले आहे.
बसपाच्या सुप्रिमोंनीशनिवारी जारी केलेल्या आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ४ डिसेंबरपासूनच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत बसपने पुन्हा देशात जातनिहाय जनगणना करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. आता देशाच्या कानाकोपऱ्यातून याची मागणी जोर धरू लागल्याने केंद्र सरकारने याबाबत तातडीने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे, असे मायावती म्हणाल्या.
महागाई, गरिबी, बेरोजगारी, खराब रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि जातीय शोषण आणि अत्याचार यांनी त्रस्त असलेल्या देशातील जनतेमध्ये जात जनगणनेबाबतची अभूतपूर्व आस्था आणि जागरुकता यामुळे केंद्रातील प्रभावी नेते अस्वस्थ झाल्याचा निष्कर्ष मायावती यांनी नोंदवला.
विविध राज्य सरकारे ‘सामाजिक न्याय’च्या नावाखाली जात जनगणना करून जनभावना शांत करण्याचा प्रयत्न करत असली, तरी केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावर योग्य जात जनगणना करेल तेव्हाच त्याचे खरे समाधान शक्य होईल, असे त्या म्हणाल्या.