मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आजपासून मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र कुठ आहे आंदोलन? असा प्रश्न उपस्थित करत मनसेवर आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यातच भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर फेसबूकवर पोस्ट करत जोरदार निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे की,’एका दिवसांत ८०० मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यात येते म्हणजे कालपर्यंत हे सगळं अनाधिकृत सुरू होतं याची कल्पना सरकारला होती. मूळात कायद्याचं पालन सर्वांनीच करणं गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी एकसमान आहे. मग अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचा कटकारस्थान करत आहेत.’
ते पुढे लिहितात,’सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले. मात्र सरकार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. त्यात हनुमान चालीसा वाजवतील म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शरद पवारांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत. राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होते.’असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांची फेसबुक पोस्ट