नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी म्हणजे आमदारांचे अपहरण करणारी जगातील सगळ्यांत मोठी टोळी आहे अशा बोचऱ्या शब्दांत आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी टीका केली आहे. ते आमदारांच्या खरेदीचा व्यवसाय करतात. या खरेदीतूनच देशभरातील अन्य पक्षांची सरकारे पाडण्याचे काम सुरू असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय सिंह म्हणाले की, भाजप जगातला सगळ्यांत मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. मात्र ही अपहरण करणारी सगळ्यांत मोठी गॅंग आहे. ऑपरेशन लोटसवरच त्यांचा पूर्ण फोकस असतो. लोकशाहीची आणि घटनेची हत्या करणे हेच त्यांचे ऑपरेशन आहे. भाजपकडून त्यांच्या निवडणूक चिन्हाच्या नावावर आमदारांच्या खरेदीचा व्यवसाय केला जातो.
मध्य प्रदेश, कर्नाटक आणि बंगालमध्येही या पक्षाकडून हा प्रयोग केला गेला. सीबीआय आणि ईडीचे भय दाखवून ते सरकार पाडण्याचे काम करत आहेत. भाजपचा दिल्लीतला प्रयोग फसला. मात्र आता ते पंजाबमध्ये तो प्रयोग करत आहेत. आपचे आमदार फोडण्यासाठी त्यांनी दिल्लीत 800 कोटींचे बजेट ठेवले होते. मात्र पंजाबमध्ये ते वाढवून 1375 कोटी रूपये करण्यात आले आहे व 55 आमदार फोडण्याचे त्यांचे टार्गेट आहे.
दरम्यान, आमदार फोडण्याच्या भाजपच्या कथित प्रयत्नांनंतर आपच्या पंजाबमधील सर्व आमदारांना आता दिल्लीला बोलावण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल या मंडळींशी चर्चा करून त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.