मुंबई – राज्यातील 7682 निवडणुकांचे निकाल लागले असून यामध्ये सर्वाधिक ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. भाजपने एकूण 2023 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसला 1215 ग्रामपंचायतींवर विजय मिळविण्यात यश आले आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटात शिंदे गटाकडे जास्त ग्रामपंचायती आल्या आहेत.
दरम्यान, या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी (दि.18) मतदान झाले होते, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने 2023, राष्ट्रवादीने 1215, शिंदे गट 772, काँग्रेसने 861, ठाकरे गट 639 तर इतर पक्षांनी 1135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपने केलेल्या दाव्यानुसार 1873 ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. तर त्यापाठोपाठ 1007 ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. इतर पक्षांनी आणि अपक्षांनी 967 ठिकाणी विजय मिळवला आहे.