महागाईवरून कॉंग्रेसचा केंद्र सरकारला टोला
नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईवरुन कॉंग्रेसने मोदी सरकावर निशाणा साधत भारतात शाकाहारी असणं गुन्हा झालं आहे असा टोला लगावला आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ विरोधी पक्षांची बैठक बोलवावी आणि पुढील 15 ते 30 दिवसांत महागाई कमी करण्यासाठी काय रोडमॅप तयार करण्यात आला आहे याची माहिती देत देशवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.
कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हटलं आहे की, मुलभूत वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार नाही इतके दर वाढले आहेत. 2012-2013 नंतर पहिल्यांदाचा महागाई इतकी वाढली आहे. नरेंद्र मोदी मात्र शांत बसले आहेत. वाढत्या महागाईबद्दल भाजपाला कोणतीही चिंता नाही.
भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी तर डाळींचे दर 15 टक्क्यांनी वाढले आहेत. चिकनचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. मसाल्यांच्या किंमती सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतात शाकाहारी राहणं आता गुन्हा झाले आहे. 2014 मध्ये कांद्याची किंमत 8 रुपये किलो होती. आज 50 रुपये किलो आहे. लसूण 290 रुपये किलो झाला असून तो खाणं पाप झालं आहे, असे यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.
रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका करताना, सरकारला जनतेची पर्वा नाही. सरकार शासन नाही तर विभाजन करतेय असा आरोप केला. मोदी तुम्ही केवळ मौनव्रत ठेवून देशाच्या जनतेला महागाई, बेरोजगारीच्या आगीत झोकून देत विभाजनाच्या आडून जबाबदारी झटकू शकत नाही असंही यावेळी ते म्हणाले. गेल्या वर्षात 50 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.