कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी टार्गेट
बारामती : भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प 2024 च्या लोकसभा निवडणूकीत पूर्णत्वाला जाईल. येथून भाजपचे कमळ फुललेले दिसेल, असा आशावाद केंद्रीय अन्न, प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केला.
बारामतीतील भाजप कार्यालयाला पटेल यांनी (दि.12) भेट दिली. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, नितीन भामे आदींची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, 2024 ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. तो देशाच्या पंतप्रधान निवडेल.
इथे येऊन जनतेची सेवा करेल. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी तर ती कधीच नसते. कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षापासून ते शहराध्यक्षा पर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तिला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नसल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले.
आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपाकडून केला जातो. घरे, गॅस, शौचालय यासंबंधीच्या योजनात आम्ही कधीही भेदभाव केला नाही. बारामतीची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक बुथवर आपला कार्यकर्ता असला पाहिजे, त्यासाठी संघटन अधिक मजबूत करू. भाजपकडील टीम अनुभवी आहेत. त्यामुळे 2024 ला परिवर्तन नक्की होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यात जल्लोषी स्वागत
जळोची -केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे बारामती तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पटेल यांच्या हस्ते तालुक्यात भाजप शाखांची उदघाटने करण्यात आली. निंबूत येथे शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी पटेल यांचे स्वागत केले. यावेळी पटेल यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, गणेश भेगडे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, गोविंद देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते. बारामती तालुक्यातील करंजेपूल, सदोबाचीवाडी- होळ, वडगाव निंबाळकर व कोऱ्हाळे येथील भाजप शाखांची उद्घाटने करण्यात आली.
विरोधकांना भीती दाखवली जाते
पटेल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भीतीची चर्चा होते, ते स्वतः भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होऊ देणार नाही, अशी भीती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता. विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे केली जात होती. परंतु ती वेळ आता गेली आहे. भाजपचा विजयी वारू कोणीही रोखू शकत नाही. जी गोष्ट नॉर्थ- इस्टमध्ये जे आतंकवादी करू शकले नाहीत. नक्षलवादी करू शकले नाहीत, मग तुम्ही कोणती मोठी ताकद आहात, असा सवाल पटेल यांनी केला.