नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आपने भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवला आहे. भाजपने आतापर्यंत इतर पक्षांची सरकारे पाडण्यासाठी 6 हजार 300 कोटी रूपयांचा खर्च केला असल्याचा नवा आरोप केजरीवाल यांनी केला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानावर सीबीआयने काही दिवसांपूर्वी छापा टाकला. तेव्हापासून आपने भाजप आणि केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. केजरीवाल यांनी शनिवारी एक ट्विट करून ते सत्र कायम ठेवले.
दही, ताक, मध, गहू, तांदूळ आदींवर वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्यात आला आहे. त्यातून केंद्र सरकारला दरवर्षी 7 हजार 500 कोटी रूपये मिळतील. सरकारे पाडली नसती; तर जीएसटी लागू करण्याची गरज भासली नसती. तसेच, जनतेलाही महागाईला सामोरे जावे लागले नसते, असे केजरीवाल यांनी म्हटले.
दरम्यान, आपने शनिवारी दिल्लीत सिसोदिया यांच्यावरील सीबीआय कारवाईचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. त्यावेळी भाजपच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआयला काय सापडले ते जाहीर करावे, अशी मागणी निदर्शनांवेळी आपने केली. (BJP has so far spent Rs 6,300 crore to topple other parties’ governments – Arvind Kejriwal)