पुणे- “आम्हालाही भोंग्यांचा त्रास होत होता. आमची भूमिका कोणाची भावना दुखवायची किंवा कोणाला उचकवायची नाही, परंतु भोंग्यांबाबतची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सामाजिक आहे,’ असे मत माजी जलसंपदामंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष, धनंजय जाधव, हेमंत लेले, संजय मयेकर आदी उपस्थित होते. प्रत्येक पक्षाची स्वत:ची वेगळी भूमिका असते. आमची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. भोंग्यांच्या बाबतीत 2005 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका कोणाची असता कामा नये, असे महाजन म्हणाले. दरम्यान, एकीकडे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजपच्या महाजन यांनीही सूर मिसळल्याने “राज’कीय चर्चा मात्र जोरात आहेत.