पुणे- शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 1 ते 14 मेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येईल. त्यानंतर दि. 17 मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये 17 मेपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल. तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल.
त्यात महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.