नवी दिल्ली : कोलकात्यामध्ये ‘देश के गद्दारों को’ची घोषणा दिल्याच्या आरोपावरुन तीन भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांनी शहीद मिनार मैदानात गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन ही घोषणा दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला. पण शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. बंगालचे भाजप उपाध्यक्ष सुभाष सरकार यांनी पक्षाचा कोणताही कार्यकर्ता या घोषणाबाजीत सामील नव्हता असे सांगितले. कोलकातातील ही मोठी रॅली होती. मला वाटते की आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे हे कृत्य आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.
तत्पूर्वी, अमित शहा यांनी सभेत ममता बॅनर्जींवर टीका केली. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन ममता बॅनर्जी यांनी राज्यात दंगल घडवली, असा आरोप शहांनी केला.