अतिक्रमण कारवाईचा माल ठेवण्यास नाही जागा
लिलाव प्रक्रिया रखडल्याने प्रशासनाची अडचण
पुणे – महापालिकेने अतिक्रमण कारवाई करून जप्त केलेले साहित्य क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या रिकाम्या जागेवर ठेवले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून ते तसेच पडून असल्याने भंगाराचे ढीग साचले आहेत. या साहित्याची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये भंगाराच्या दुकानांसारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून पोलिसांच्या मदतीने अनधिकृत आणि नियमबाह्य पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमली असून क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही कारवाई एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्या सोबतीला मुख्य कार्यालयाकडील मनुष्यबळही या कारवाईमध्ये लावले आहे.
शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्येही अतिक्रमणे वाढत चालली आहेत. उपनगरांसह शहरात लोकसंख्या वाढते आहे. त्याप्रमाणात अतिक्रमणेही वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रात्रीच्यावेळीही अतिक्रमण कारवाई करायला सुरुवात केली आहे.
पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटविण्याचे काम करीत आहेत. मागील वर्षभरात अतिक्रमण विभागाने विविध ठिकाणी कारवाई करीत जप्त केलेल्या स्टॉल्स आणि हातगाड्यांची संख्या वाढली आहे. दंड भरल्यानंतर स्टॉल व हातगाडी धारकांना त्यांच्या वस्तू परत केल्या जातात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून हे साहित्य घेऊन जाण्यासाठी पथारी व्यावसायिकही येत नसल्याने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे या साहित्याचा ढीग लागला आहे. त्याचा लिलाव पालिका प्रत्येक वर्षी करते मात्र यावर्षी हा लिलाव रखडल्याने हे साहित्य भंगारात पडून आहे.