येत्या काही दिवसांत आवक वाढणार; रविवारी पुण्यात 35 टन आवक
पुणे – गोड, आंबट चवीच्या द्राक्षांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. रविवारी येथील घाऊक बाजारात तब्बल 35 टन इतकी आवक झाली. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भावात 15 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची आणि अरविंद मोरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे द्राक्षांचा सुरुवातीचे उत्पादन खराब झाले आहे. पण, सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, तसेच फलटण, सोलापूर, सांगली या भागातून द्राक्षांची आवक सुरू आहे. जानेवारीत द्राक्षांना फारशी गोडी नव्हती.
मात्र, हिरव्या रंगाच्या “सोनाका’ जातीच्या द्राक्षांना सध्या सर्वाधिक पसंती असून ही द्राक्षे चवीला गोड असून रंगाने हिरवे, पिवळ्या रंगाची आहेत. त्याचा आकारही आकर्षक आहे. त्यामुळे त्याची आवक वाढल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाव उतरल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या 35 टनांपर्यंत पोहोचलेली आवक या महिन्यात 50 टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा 35 टनांपर्यंतच येऊ शकते. काळ्या रंगाच्या जम्बो, कृष्णा शरद या जातीच्या द्राक्षांना देखील मागणी आहे. पण हिरव्या पिवळ्या रंगाच्या द्राक्षांना सर्वाधिक पसंती आहे. पुण्याबाहेरही द्राक्षांना मागणी असल्याने त्याठिकाणी द्राक्षे पाठवली जात आहेत. तसेच फेरीवाल्या विक्रेत्यांकडून देखील अधिक मागणी होत आहे. द्राक्षांचे भाव उतरल्याने फेरीवाल्यांकडे तसेच छोट्या मोठ्या बाजारात द्राक्षांचे भाव कमी होतील, असे काची यांनी यावेळी नमूद केले.