डॉ. शा.ब.मुजुमदार (संस्थापक, सिम्बायोसिस)
सत्ता असताना माणसांचा गराडा हा कायम असतो. पण सत्ता नसतानाही सामान्य माणसांना हा नेता आपलासा वाटत राहतो. हेच शरद पवार यांच्या नेतृत्वातील खरे वैशिष्ट्य आहे. जनताच नव्हे सर्वपक्षीय नेत्यांना त्यांच्याविषयी एक विलक्षण आत्मियता वाटते. विकासाची सर्वांगीण दृष्टी असणारा असा नेता आता तरी नजरेसमोर दुसरा येत नाही.
शरदरावांचा असा अकृत्रिम स्नेह मला मिळाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. माझ्या 75व्या आणि 80 व्या वाढदिवशीही माझा शरदरावांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मला 2005 मध्ये जेव्हा भारताच्या राष्ट्राध्यक्षानी “पद्मश्री’ आणि 2012 मध्ये “पद्मभूषण’ प्रदान करण्यात आले तेव्हा त्या दोन्ही प्रसंगी शरदरावांच्या हस्ते सत्कार होण्याचे भाग्य मला लाभले. कसले तरी अदृश्य नाते असल्याशिवाय असे प्रसंग आयुष्यात येत नाहीत, अशी माझी प्रांजळ भावना आहे.
“सिंबायोसिस’ संस्थेची जडण-घडण शरदरावांनी जवळून पाहिली आहे. तोंडावर स्तुती वा प्रशंसा करण्याचा शरदरावांचा स्वभाव नाही. पण अनेकांच्या जवळ संस्थेबद्दल आणि माझ्याबद्दल ते कौतुकाने बोलत असतात हे मी अनेकांकडून ऐकले आहे. सिंबायोसिस स्किल ऍण्ड ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना पुण्यात केल्यानंतर शरदराव व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई मुद्दाम वेळ काढून भेट देण्यास आले होते. कौशल्य शिक्षणातूनच रोजगार निर्मिती होऊ शकते असे त्यांचे ठाम मत आहे.
सिंबायोसिसमध्ये आयोजित केलेल्या एका समारंभास शरदराव आले होते. समारंभ संपल्यानंतर एका छोट्या हॉलमध्ये चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी त्यांच्याशेजारी बसलो होतो. त्यांना भेट देणाऱ्या व्यक्ती मुद्दाम न्याहाळून पाहात होतो. त्यांना भेट देणाऱ्यात तरुण-तरुणी, वृद्ध, स्त्री-पुरुष यांची भाऊगर्दी झाली होती. शरदरावांना सत्ता नसल्यामुळे अर्ज, विनंत्या करण्याचा प्रश्नच नव्हता. येणारा प्रत्येकजण त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करत होता आणि शरदरावांच्या आठवणी काढत होती. मंत्री नसताना, कोणतीही सत्ता नसताना, देण्यासारखं काहीही नसताना या माणसाकडे इतकी माणसं का आकर्षित होतात? शरदरावांच्या रक्तांतच लोकांना आकर्षून घेणारे चुंबकीय कण असावेत. सत्तेवर नसतानाही लोकार्षणाचे भाग्य फार थोड्या राजकारणी व्यक्तींना लाभते. म्हणूनच मला वाटतं शरदराव महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात असलेला एक आणि एकमेव ठेवा आहे. म्हणूनच प्रत्येकाला शरदराव आपले वाटतात.
राजकारणात आणि समाजकारणात असे भाग्य टिळक, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर केवळ शरदरावांना मिळाले. लोकांना शरदरावांचा एक मानसिक आधार वाटतो. मला वाटतं अशा प्रचंड लोकप्रियतेतून शरदरावांनासुद्धा “कायनेटिक एनर्जी’ मिळत असावी. त्यामुळेच ते महाराष्ट्रात आणि देशांत सतत संचार करत असतात. अनेकांना भेटत असतात. त्यांच्या अडचणी समजावून घेत असतात.
शरदरावांचा अमृतमहोत्सव दिल्लीत साजरा झाला. भारताचे राष्ट्राध्यक्ष प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपराष्ट्राध्यक्ष हमीद अन्सारी, फारूख अब्दुल्ला असे अनेक पक्षांचे दिग्गज नेते शरद पवारांना सदिच्छा देण्यासाठी एकाच व्यासपीठावर जमले होते. प्रणव मुखर्जींनी भारतातील राजकीय विविधता एकाच व्यासपीठावर आली यातच शरदरावांचे मोठेपण कसे आहे हे सांगितले.
भारताला पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यासारखे कर्तबगार आणि लोकप्रिय पंतप्रधान लाभले. यापैकी प्रत्येकाने त्यांच्या काळात काही ऐतिहासिक कामगिरी केली व भारताच्या इतिहासात कायमचे स्थान मिळविले. पण काही जणांना मात्र शासनातील प्रदीर्घ अनुभव, प्रचंड लोकसंग्रह व लोकमान्यता, भारदार व्यक्तिमत्त्व अनेक खात्यांच्या मंत्रिपदाचा अनुभव, प्रगल्भ विचार, प्रचंड वाचन भारताच्या व जगाच्या इतिहासाची व राजकारणाची जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, नेतृत्व करण्यास आवश्यक असणारे सर्व गुण, अजब इच्छाशक्ती, हेवा वाटणारी स्मरणशक्ती असूनही पंतप्रधान पद मिळू न शकलेले एकमेव, प्रत्येक पक्षात असलेले त्यांचे मित्र असे व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार. ते पंतप्रधान आजवर का होऊ शकले नाहीत याची खंत अनेकांना आहे.
शरद पवार आपण पंतप्रधान होणार नाही असे वारंवार सांगतात पण In politics ‘one week is a long period’ असं म्हणतात. नियतीच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नाही पण नियती नियत असलेल्या नेत्यांना पाठिंबा देते असं मला वाटतं. हे जर खरं असेल तर शरदराव नियतीचे पंतप्रधान पदासाठी एकमेव उमेदवार असतील. शरदरावांनी पंतप्रधान व्हावं हे आम्हा सर्वांचं स्वप्न आहे. ते साकार होवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.