– श्री. प्रदिप गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
शब्दांकन : नीलकंठ मोहिते, (इंदापूर तालुका प्रतिनिधी)
बदलत्या काळानुसार स्वतःला बदलून समाजाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब…! 81 वर्षे वय असलेल्या साहेबांसमोर 18 वर्षांचा तरुण युवक जरी बसला, तरी त्याचे विचार ऐकून घेऊन, त्याच्या योग्य त्या सूचनेप्रमाणे पक्ष संघटनेत, सामाजिक, राजकीय तसेच प्रशासनातही बदलाव घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहून काळाशी सुसंगत असलेला बदल मान्य करणारे कार्यकुशल नेतृत्व म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे पाहिले जाते.
साहेबांचा परीसस्पर्श
अशा दूरदृष्टी असणाऱ्या आदरणीय साहेबांच्या सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, हे आम्ही भाग्य समजतो. खूप काही शिकायला मिळाले. आलेल्या त्यातून संकटाचा मुकाबला करणे यातून मार्ग कसा काढायचा? याचा व्यक्तिगत जीवनामध्ये देखील खूप फायदा झाला. खूप कार्यकर्त्यांना अनेक वर्षे पक्षात काम करुन काय फायदा झाला? असा प्रश्न पडतो. त्या सर्वांना माझे हेच सांगणे राहील आपण व्यक्तीगत फायद्यापेक्षा साहेबांच्या सानिध्यात राहील्याने समाज महाराष्ट्र व राष्ट्राचा किती फायदा होतो आहे. याचा विचार करा. या विचारामधूनच तुम्हाला तुमचा स्वतःचा फायदा कसा झाला ते कळेल. म्हणूनच म्हटले जाते साहेब समजायला खूप वेळ लागतो.
साहेब समजणे अवघड
साहेबांच्या राजकारणातील मागील साठ वर्षात अनेकांना पवार साहेबांची विचारसरणी नेमकी कोणती? एवढी मोठी राजकीय इच्छाशक्ती व दूरदृष्टी साहेबांना कशी लाभली? याबाबत उत्सुकता राहिली आहे. मला असे वाटते दैववादापेक्षा प्रयत्नवादाची कास धरुन त्यावरती आधारीत समाजउभारणी करण्याची त्यांची वेगळीच विचारसरणी आहे. ज्याला आपण प्रॅक्टिकल लाइफ म्हणतो. त्यांची ही नविन विचारसरणी समाजायला अजून खूप वेळ लागणार
आहे.
साहेबांनी स्वतःच्या तरुण वयात देशात पहिलाच केलेला पुलोदचा प्रयोग यशस्वी केला. 1980 च्या दशकात विभिन्न विचारांची माणस एकत्र आणून चमत्कार घडवला होता. कॉंग्रेसमधून एस कॉंग्रेसमध्ये आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली. त्यानंतर 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली. त्या-त्या काळात त्यांनी काळानुरूप बदल केले. त्याकाळात हे बदल योग्यच ठरले. हे सगळे बदल करत असताना त्यांनी पुरोगामीत्व सोडले नाही. ज्या पक्षात काही चुकीच्या गोष्टी होत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी योग्य निर्णय त्यावेळी घेतले. ते निर्णय त्यांनी यशस्वी करून दाखविले. पुढे जाऊन ते घेतलेले निर्णय समाजाच्या व महाराष्ट्राच्या हिताचेच ठरले.
विभिन्न राजकीय विचारांची माणसे एकत्रित आणण्याचे सामर्थ्य या देशामध्ये केवळ साहेबांकडे आहे. अशी माणसे देशात क्वचितच आहेत. विविध राजकीय मतभिन्नता असणारी माणसे समाजाच्या देशाच्या हिताच्या गरजेनुसार एकत्रित आणणे व त्यांच्यात एकसूत्रता आणून, सामाजिक उन्नती घडवून आणणे हे साहेबांचे उद्दिष्ट हे कायम राहिले आहे.
प्रचंड निरीक्षण क्षमता, समाजाप्रती असलेली संवेदनशीलता व समाजात घडत असणाऱ्या घटनांबाबत क्षणा क्षणाला सावधपणा, वेळप्रसंगी कठोरपणा, निर्णयक्षमता, इत्यादी गुणांमुळे साहेबांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच खुलत गेले. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांचा सखोल अभ्यास असल्यामुळे सर्व समाज मनांवरती साहेबांची घट्ट पकड असल्याचे जाणवते.
संघटन आणि साहेब हे आपुलकीचे व प्रेमाचे घट्ट नाते आहे. तीन पिढ्यांचे संघटन एकत्रित ठेवून, संघटना, मजबूत करण्याचे कौशल्य साहेबांकडे आहे. आजही प्रचंड व्यापातून साहेब पक्ष संघटनेसाठी मोलाचा वेळ देतात. त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतात. त्यामुळे पक्षसंघटनेत व सरकारमध्ये काय घडामोडी चालल्या आहेत. तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात काय हालचाली चालल्या आहेत. विरोधकांमध्ये काय चर्चा सुरू आहे. याचा अचूक वेध साहेब घेत असतात. त्यामुळे राजकारणाची वेधशाळा म्हणूनही अनेक दिग्गजांनी साहेबांना संबोधले आहे.
साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये काम करत असताना, सामाजिक कार्य करण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. प्रत्येक टप्प्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा साहेबांकडून मिळते. सामाजिक हिताच्या प्रत्येक घटकावर बारकाईने लक्ष देऊन समाजात परिवर्तन करण्याची क्षमता असलेल्या विविध आघाड्यांची (फ्रंटल सेलची) स्थापना करणे ही साहेबांच्या सुपीक विचारातून उदयास आलेली संकल्पना आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, तसेच युवती सेल, सामाजिक न्याय विभाग, युवक कॉंग्रेस सेल, विद्यार्थी कॉंग्रेस सेल, लायब्ररी सेल, वक्ता प्रशिक्षण सेल, डॉक्टर्स सेल, लिगल सेल, राष्ट्रवादी किसान सभा, महिला कॉंग्रेस सेल, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, अपंग विभाग, भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती सेल, अशा विविध सेलची स्थापना करण्यात आली. या सेलच्या माध्यमातून ज्या त्या अडचणीतील घटकांना प्रशासकीय स्तरावर मदत मिळवून देऊन, परिवर्तनाचे काम गुणवत्तापूर्वक करण्यात येत आहे. फक्त राजकारणापुरते नाही तर इतर वेळेला सुद्धा कार्यकर्ता सामाजिक कार्यात व्यस्त राहतो. संघटनेला जोडून राहतो. हा साहेबांचा यामागील दृष्टिकोन आहे. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असलेल्या आदरणीय साहेबांचा या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हयातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्यावतीने मी त्यांना-कोटी कोटी शुभेच्छा देतो.