नवी दिल्ली – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर सुकेश चंद्रशेखर हा 32 वर्षांचा कोट्याधीश तरूण संपूर्ण देशात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. गतवर्षी जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही, रणबक्षी या औषध कंपनीचे तुरुंगात असलेले मालक शिवेंद्रसिंग यांची नावे सुकेश चंद्रशेखरने केलेल्या घोटाळ्यांमध्ये आल्यानंतर सुकेशची फसवण्याची कार्यपद्धती आणि हुशारी पाहून पोलिस आणि सगळ्यांवरच चकीत होण्याची वेळ आली आहे. जाणून घेऊयात फिल्मी स्टाईल फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेश चंद्रशेखरबाबत…
प्रभावी संवाद कौशल्य
कुणीही त्याला पहिल्यांदा भेटल्यावर तो अगदी साधा आणि सर्वसामान्य व्यक्ती असल्याचा कुणाचाही समज होतो. त्याने जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही पासून अनेक उद्योगपती आणि राजकीय नेत्यांकडून सहजपणे कोट्यावधी रुपये खंडणीपोटी उकळले आहेत. त्याच्या या हातखंड्याला कारवाई म्हणायचे तर स्वतःला सादर करण्याचे आणि बोलण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याकडे आहे असेच म्हणावे लागेल.
त्याला जेव्हा दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली तेव्हा जे पोलिस अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी त्याची चौकशी करू लागले त्याच्या बोलण्याने ते देखील प्रभावित झाले. असे सांगितले जाते की, त्याला पहिल्यांदा भेटणारी व्यक्ती 30 मिनिटे त्याच्याशी संवाद साधत राहिली तर त्याचे सल्ले ऐकू लागते.
अल्पवयीन असताना फसवणुकीचे गुन्हे
सुकेशचा जन्म बंगळुरूमध्ये एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील विजय चंद्रशेखर यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या मुलाने खूप शिकावे असे त्यांना वाटत असे. परंतु, सुकेश फक्त बारावीपर्यंत शिकला आणि नंतर त्याने रिअल इस्टेटमध्ये काम सुरु केले. त्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, लहानपणापासून कोट्याधीश होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने पैसा कमावण्याची त्याची तयारी होती. त्याने त्याचे स्वप्न साकार केले पण स्वप्न साकार झाल्यानंतर आता त्याच्यावर तुरुंगात राहण्याची वेळ आलेली आहे.
अल्पवयीन असल्यापासूनच म्हणजे वयाच्या 17 व्या वर्षापासून फोनवर आपण सरकारी अधिकाऱी असल्याचे सांगून लोकांना फसवण्याचा उद्योग त्याने सुरु केला होता. 2007 मध्ये 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच आपण बंगळूर विकास प्राधिकरणातील वरीष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे सांगून त्याने शंभर पेक्षा जास्त व्यक्तींना फसवले होते. त्याबद्दल त्याला बंगळूरमधील बाणेरघट्टा पोलिस ठाण्यात अटकही झाली होती.
पोलिस कोठडीतून बाहेर पडल्यावर त्याला असे वाटू लागले की, आता थांबणे, मागे फिरणे मूर्खपणाचे आहे. मग त्याने साथीदार गोळा केले आणि लोकांना फसवण्याचे आणि खंडणी गोळा करण्याचे रॅकेट तयार केले. त्याला पोलिसांनी अनेकवेळी अटक केली. पण जामीनावर बाहेर आला की तो पुन्हा लोकाना फसवण्याचे धंदे सुरु करायचा.
तो चित्रपटसृष्टीचा आणि विशेषतः बॉलिवुडचा चाहता आहे. 2010 मध्ये तो मद्रास कॅफे या चित्रपटात भूमिका केलेली अभिनेत्री लीन पॉलोजच्या संपर्कात आला. लवकरच ते दोघे एकत्र राहू लागले. लोकांना फसवण्याच्या कामात लीना देखील त्याची साथीदार बनली. 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. त्याने लीनाशी लग्न केले असले तरी बॉलिवुडमधील अनेक अपरिचित, नवख्या अभिनेत्रींशी त्याची प्रेमप्रकरणे चालू होती. अगदी यावर्षी पोलिसांनी त्याला अटक करेपर्यंत त्याच्या सगळ्या भानगडी चालू होत्या.
प्रत्येकवेळी नवे साथीदार
पोलिसांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक वेळी गुन्हा करण्यासाठी गरजेनुसार तो नवख्या लोकांना सामील करून घ्यायचा. फक्त लीना त्याच्यासोबत पहिल्यापासून गुन्हेगारी कृत्यात साथीदार म्हणून होती. फसवणुकीबद्दल तिला सुकेशबरोबर तीनवेळा अटक झाली होती.
मुंबईतही पॉन्झी योजना
2015 मध्य दोघेही मुंबईला स्थलांतरीत झाले आणि त्यांनी फसवणुकीसाठी एक बनावट योजना सुरु केली. त्यामध्ये जवळपास 450 जणांनी पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची सुमारे 19.5 कोटी रुपयांची फसवणूक करून दोघांनी ही योजना गुंडाळली. या प्रकरणातही दोघे आरोपी आहेत.
तुरुंगातूनही फसवणुकीचे गुन्हे
एवढे झाल्यावरही जामीनावर बाहेर आला की त्याने केंद्रीय कायदा मंत्रालयातील, गृह मंत्रालयातील अधिकारी, न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून लोकांना फसवण्याचे उद्योग चालू ठेवले. जयललिता यांच्या निधनानंतर त्याच्या पक्षात फूट पडली तेव्हा पक्षाचे खजिनदार आणि खासदार टीटीव्ही दिनकर यांनी पक्षाचे दोन पानांचे चिन्ह आपल्याच गटाला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते.
याची कुणकुण लागताच सुकेशने त्यांच्याशी संपर्क साधला. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी दिनकर यांच्याशी 50 कोटींचे डील केले. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांशी आपला संपर्क असून तुम्हांला दोन पानांचे चिन्ह मिळेल असे त्याने सांगितले होते.
या प्रकरणात नंतर सुकेशला अटक झाली. त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. तेथील अधिकाऱ्यांशी आणि बड्या-श्रीमंत कैद्यांशी संधान साधून पत्नीच्या मदतीने फसवणुकीचे नवे रॅकेट सुरु केले. मोबाईल फोनमधील वेगवेगळ्या अप्लिकेशनचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करून तो तुरुंगात असलेल्या शिवेंद्रसिंग या उद्योगपतीच्या पत्नी आदिती सिंग यांच्याशी संपर्क साधू लागला.
वेगवेगळ्या वेळी तो आपण केंद्रीय कायदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून पतीला तुरुंगातून सोडवण्यासाठी रक्कम मागू लागला. एकदा तर फोनवर बोलताना त्याने गृहमंत्री अमित शहा फोनवरील बोलणे ऐकत असल्याचे आणि शांतपणे बोला, असे आदिती सिंग यांना सांगितले होते.
अशा प्रकारे फोन करून 2020-21 या कालावधीत तुरुंगात असताना त्याने आदिती सिंग यांच्याकडून सुमारे 200 कोटी रुपये उकळले. समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी आणि आपण खरोखरच वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी तो संभाषणाच्या शेवटी जयहिंद म्हणून फोन बंद करत असे.
जॅकलिन, नोरा फतेही अडचणीत
तुरुंगात असतानाच त्याने जॅकलिन फर्ऩांडिस, नोरा फतेही अशा अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू, अलिशान कार भेट म्हणून दिल्या. ऑस्ट्रेलियात शिकत असलेल्या जॅकलिनच्या भावाच्या खात्यातही त्याने 15 लाख रुपये ऑनलाईन भरले.
या सगळ्या भानगडीत अडकल्यामुळे पोलिसांनी जॅकलिनला परदेशात जाण्यापासून विमानतळावर रोखले होते. या सगळ्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून तिचीही चौकशी चालू आहे. आजच ईडीने तिच्यावर कारवाई केली आहे. सुकेश आता फसवणुकीच्या किमान 32 फौजदारी गुन्ह्यांमध्ये अडकला असून या प्रकरणांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर सीबीआय, ईडी आणि प्राप्तीकर विभागतर्फे तपास सुरु आहे.