नवी दिल्ली – देशात कोळसा उपलब्ध आहे, पण हा कोळसा वीज केंद्रांपर्यंत पोहचतच नाही, त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये वीज टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. देशातल्या 16 राज्यांमध्ये रोज दहा तासांचे लोडशेडिंग करावे लागत आहे. उत्तर प्रदेश सारख्या भाजप शासित राज्यात ग्रामीण भागात आज दिवसांतून केवळ चार तासांचाच वीजपुरवठा होतो आहे. आता यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी देशव्यापी कोळसा संकटावर मोदी सरकारवर खोचक टीका केली. देशात मुबलक प्रमाणात कोळसा आहे. मोठं रेल्वे नेटवर्क आहे. शिवाय थर्मल पॉवर प्लांट्स देखील आहेत. तरीही विजेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यासाठी मोदी सरकारला दोष देता येणार नाही. हे तर काँग्रेसच्या ६० वर्षांतील सत्तेचा परिणाम असल्याची उपरोधिक टीका केली चिदंबरम यांनी केली.
प्रचुर मात्रा में कोयला, बड़े रेल नेटवर्क, ताप संयंत्रों में अप्रयुक्त क्षमता, फिर भी बिजली की भारी किल्लत है।
मोदी सरकार को दोष नहीं दिया जा सकता। यह कांग्रेस के 60 साल के शासन के कारण है!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 30, 2022
पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, कोळसा, रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालयात कोणतीही कमतरता नाही. दोष काँग्रेस नेत्यांचा आहे जे या खात्यांचे मंत्री होते. उलट मोदी सरकारने कोळशाच्या वाहतुकीसाठी पॅसेजर ट्रेन रद्द करून माल वाहतुक ट्रेन वाढविण्याचा मार्ग काढला. ‘मोदी है तो मुमकिन है, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली.