पुणे – स्वभावातील तफावतीमुळे दीड वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या इंजिनिअर उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या 9 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
दोघांनी ऍड. विजयकुमार बिराजदार, ऍड. ऋषिकेश खंडेलवाल, ऍड. नंदकिशोर येरंडे आणि ऍड. हर्ष खंडेलवाल यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही इंजिनिअर आहेत. पुण्यात नोकरी. त्यांना मुलबाळ नाही. ध्रुव आणि ध्वनी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. जानेवारी 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. अवघ्या काही दिवसाच्या संसारानंतर दोघे वेगळे राहत होते. न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. निकालानुसार दोघांत कोणतेही देवाण-घेवाण नाही.
दोघेही इंजिनिअर आहेत. कमविते आहेत. दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार आहेत. त्यामुळे दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे दोघांच्या वेळेची बचत झाली आहे. ते स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत. ऍड. विजयकुमार बिराजदार, अर्जदारांचे वकील.