नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून देशात बाइक टॅक्सी खूप लोकप्रिय झाली आहे. मात्र आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अलीकडेच दिल्लीत या बाइक टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता वाहतूक कोंडीत भरच पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत देशात बाइक टॅक्सीचा ट्रेंड खूप वाढला आहे. स्वस्त असण्याव्यतिरिक्त, ते सोयीस्कर देखील आहेत. शिवाय एका व्यक्तीसाठी कारपेक्षा ते जास्त सोपे पडते. या बाईक टॅक्सी सहजपणे ऑनलाइन बुक केल्या जाऊ शकतात. बरेच लोक रोजच्या प्रवासासाठी किंवा इतर कारणांसाठी बाइक टॅक्सी वापरतात. अशा परिस्थितीत त्यांची संख्याही देशात खूप वाढली आहे. यासोबतच रॅपिडो आणि उबेरसारख्या कंपन्यांची बाजारपेठही देशात झपाट्याने वाढली आहे.
पण आता दिल्लीतील या बाईक टॅक्सींबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बाइक टॅक्सी दिल्लीत बंद करण्याचा अनाकलनीय निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत बाइक टॅक्सीचा वापर बंद करण्यासाठी ऍडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. नोंदणीशिवाय टॅक्सी म्हणून दुचाकी वापरणे मोटार वाहन कायदा 2019 चे उल्लंघन असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. हे लक्षात घेऊन दिल्लीच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सीचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
या आदेशानंतरही बाईक टॅक्सी वापरल्यास काय कारवाई केली जाईल याची माहिती दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने आपल्या ऍडव्हायझरीत दिली आहे. प्रथमच असे करताना पकडले गेल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल. दुसऱ्यांदा असे करताना पकडले गेल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागेल. वारंवार चुका केल्यास बाईक टॅक्सी चालकाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. असे केल्यास 1 वर्ष तुरुंगवासाची तरतूद निश्चित करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अशा परिस्थितीत बाईक टॅक्सी चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.