पटना – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, बिहार निवडणुकीचा अंतिम निकाल हाती येण्यासाठी मध्यरात्र होणार, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
“बिहार विधानसभा निवडणुक मतमोजणीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. इव्हीएमच्या संख्येत 63 टक्के वाढ झाली असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू राहील”, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
करोना विषाणूमुळे निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या वाढवली होती. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होण्यास मध्यरात्र होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 4 कोटी 16 लाख नागरिकांनी मतदान केले होते. दुपारपर्यंत त्यापैकी सव्वालाख मतांची मोजणी झाली असून अर्वरित मतमोजणी सुरू आहे.
मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्ह दिसत आहेत.