मुंबई – पैशा अभावी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे राज्य परिवहन मंडळाला शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्यासाठी राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. पुढील सहा महिने ही मदत टप्प्याटप्याने मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात येत आहे. परब हे राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की आर्थिक अडचणीत आलेल्या एसटी मंडळाला या मदतीमुळे मोठाच हात मिळणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसा उपलब्ध होणार आहे.
पुढील सहा महिने हा पैसा उपयोगी पडणार आहे. एसटीचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत असून लवकरच एसटी आपल्या नेहमीच्या मार्गावर येईल असे ते म्हणाले.
करोनाच्या काळात एसटी अनेक महिने बंद असल्याने एसटीला तब्बल तीन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देणेही शक्य झाले नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला होता. त्यातील एक महिन्याचा पगार वितरीत झाला असून उर्वरीत दोन महिन्यांचा पगार दिवाळीपुर्वी वितरीत केला जाणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.
पगार थकल्यामुळे एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील एक आत्महत्या जळगाव जिल्ह्यात तर दुसरी आत्महत्या रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे.