मुंबई – राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.
दरम्यान, पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेताना काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. आषाढी वारीसाठी यंदा जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळं प्रशासनानं चोख नियोजन करावं, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. तसंच, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही देखील त्यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, “वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागानं स्टिकर्स किंवा पासेसच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असं नियोजन करावं. पालखी मार्गावरील टोल नाके सुरू होणार नाहीत’. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तसेच ते पुढे म्हणाले, पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत 5 वरून 10 कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता 25 वरून 50 लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.