पवन मावळ – हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली. भाताचा चांगला उतरा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. वातवरण असेच राहिले तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे भात शेताकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळयांत पाणी येत आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी की नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने अडचण वाढत आहे. प्रसंगी 350 रुपये, 400 रुपये व 500 रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गेले काही वर्षे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पाऊस आणखी पडला तर यावर्षीही मोठ्या नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांना भात कापणीसाठी मजूर मिळेनासा झाला आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.भातपिक आडवे पडले आहे व ते पाण्याखाली आहे. लवकरात लवकर पंचानामे करुन नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळावी
– तानाजी लायगुढे (शेतकरी)