राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – राजगुरुनगर येथे आज १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणा दरम्यान मोठा गोधळ झाला. आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील लसीकरणासाठी लावण्यात आलेल्या रांगाबाबत चुकीच्या समजामुळे नागरिक पोलिसांमध्ये हुज्जत झाली.
राजगुरूनगर शहरात मुंबई माता बाल संगोपन केंद्रात पुन्हा १८ वर्षावरील लसीकरण सुरु झाले आहे दररोज तीनशे जणांना लसीकरण केले जाते. आज दि.२८ रोजी लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांसह १८ वर्षावरील नागरिकांनी सकाळी ७ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर गर्दी केली. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज १० वाजता लसीकरण करण्यास सुरवात केली जाते. मात्र नागरिक सकाळी ७ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर गर्दी करतात.
आज सकाळी पासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना गर्दी होऊ नये म्हणून १ ते ३०० पर्यंत टोकण दिले होते. टोकण घेतलेले नागरिक आजूबाजूला उभे राहिले होते. तर तीनशेपेक्षा जास्त नागरिक आल्याने तेही टोकन साठी आरोग्य विभागाशी वाद घालत होते. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिक आल्याने मोठी गर्दी झाली सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने आणि गर्दी झाल्याने याठिकाणी पोलीस आले.
आरोग्य विभागाने या ते ३०० टोकण दिले त्यानुसार लसीकरण सुरु करण्यात येणार होते तोच पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी गर्दी टाळण्यासाठी रांगा लावण्याची तंबी दिली. सकाळीपासून रांगेत उभे राहून नंतर टोकन घेऊन बाजूला उभे असणारे नागरिक मागे राहणार म्हणून त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
मागून आलेले पुढे जात असल्याने नागरिक आक्रमक झाले त्यांच्यात आणि पोलिसांत मोठी हमरीतुमरी झाली. पोलिसांनी त्यांच्या बळावर त्यांनी आरोग्य विभागाने केलेली यादी (टोकण) रद्द करून रांगा लावण्यास सांगितल्याने काही काळ मोठा गोंधळ झाला. नागरिक आणि उपस्थित पोलीस यांच्यात हमरीतुमरी झाली.जेष्ठ नागरी युवक यावेळी आक्रमक झाले होते. ३०० लस नागरिक ५०० पेक्षा जास्त आल्याने हा गोंधळ झाला तर सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला. अगोदर रांगा करून टोकण घेतलेल्या नागरिकांचे अखेर लसीकरण करण्यात आले.
पोलिसांनी अचानक येऊन केलेल्या गोंधळामुळे जेष्ठ नागरिकांसह युवकांनी नाराजी व्यक्त केली. शेवटी टोकण पद्धतीने लसीकरण झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी याठिकाणी येऊन गर्दी पांगवली. काही काळाच्या गोंधळानंतर लसीकरण सुरळीत झाले.