मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग आणि रियाझ भाटी तसेच विनय सिंग या तिघांना मुंबई न्यायालयाने फरार घोषित केले. मुंबई पोलिसांमध्ये दाखल असलेल्या खंडणीच्या प्रकरणात ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने केली.
गोरेगाव पोलिसांकडे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमवीरसिंह यांना फरार जाहीर करण्याची मागणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात मुंबई पोलिसांनी शनिवारी केली होती. त्यांच्यासोबत विनय सिंग आणि रियाझ भाटी यांनाही फरार घोषित करण्याची मागणी केली होती. ते फरार झाले असून त्यांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
शहर पोलीस आता त्याच्या अधिकृत निवासस्थानावर 30 दिवसांत हजर होण्याची नोटीस चिटकवतील आणि त्याची जाहिरात वर्तमानपत्रात देतील. त्यात जर ते हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने या प्रकरणात तीनही आरोपींविरूध्द गेल्या महिन्यात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. ठाण्यातील न्यायालयानेही त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तिसरे अजामीनपात्र वॉरंट गेल्या आठवड्यात मरिन ड्रईव्ह पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात बजावण्यात आले.