मुंबई – मला फसवण्यासाठी सरकाराने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा वापर केला. त्याचे बक्षिस म्हणून त्यांचे निलंबन सरकारने मागे घेतले, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक झाली. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले होते. बैठकीत आगामी निवडणुकांची रणनिती व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीपूर्वी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देशमुख पुढे म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे, त्या सरकारनेच मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर केला. आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा मी उचलणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत यावर सविस्तर भूमिका मांडेल. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याप्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला होता.
देशमूख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने नुकतेच मागे घेतले. परमबीर सिंह यांचे पोलिस दलातील बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी तत्कालिन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली होती.