नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील एक दोन नव्हे तर चक्क 64 नेत्यांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
तारा चंद यांच्याशिवाय माजी मंत्री माजीद वाणी, डॉ मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि माजी सरचिटणीस विनोद मिश्रा यांनी देखील पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एकत्रित राजीनामे सादर केले आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या राजीनाम्यावर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया आली आहे. आझाद म्हणाले, “सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील.”