नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. देशात तब्बल तीन महिन्यांनंतर करोना बाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्सव काळात ही समाधानकारक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.
रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन करोनाबाधित आढळले होते. ही जून महिन्यानंतर करोना रुग्णसंख्येत झालेली सर्वाधिक घट आहे. याआधी 07 जून रोजी देशात 7,233 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यानंतर करोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळाला.
देशातील करोना रुग्णांप्रमाणे करोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. देशात गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
राज्यात 810 करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1012 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,37, 588 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्के इतकं झाले आहे.