परिसरातील नागरिक भयभीत
केंदूर – करंदी (ता. शिरूर) येथे बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला आहे. करंदी, पिंपळे जगताप, जातेगाव परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. नागरिकांनी रात्रीच्यावेळी अनेकवेळा बिबट्या पाहिल्याची चर्चा परिसरात होती. त्यानंतर वनविभागाला देखील याची खबर देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेवटी एका वासराला आपला जीव गमवावा लागला आहे.
करंदी येथील शेतकरी संतोष गायकवाड यांच्या गोठ्यातून बिबट्याने मध्यरात्री एका वासराला ठार करत उसाच्या शेतात नेऊन खाऊन टाकल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. करंदी, जातेगाव परिसरात उसाच्या शेतीचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्या दडून बसण्यासाठी उसाच्या शेतीचा आधार घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर करंदी येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.