ओलांडली शंभरी : हॉटेल, खानावळीच्या ताटातूनही कांदा गायब
दरवाढीमुळे उपहारगृहांमधून कांदा गायब : कांद्यासाठी वेगळा दर आकारण्याचा फंडा
पिंपरी – मोशी उपबाजार समिती तसेच पिंपरी येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमध्येही गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे, मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत. रविवारी तर पिंपरी भाजीमंडईमध्ये कांदा 90 ते 100 रुपये किलो दराने विक्री होत होती. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना नाष्टा सोबत कांदा देणे परवडत नसल्याने आता नाष्ट्या सोबत काकडी दिली जात आहे.
महाराष्ट्रामध्ये जेवणामध्ये, नाष्ट्यामध्ये कांद्या शिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होत नाही. कांदा विविध पदार्थाची लज्जत वाढवत असतो. अनेकांच्या घरी जेवणातही कांदाच लागतो. त्यामुळे, मागील काही वर्षांपासून उपहारगृहामध्ये विविध खाद्य पदार्थासोबत कांदा फुकट दिला जात असे; मात्र सध्या कांद्याचे कांद्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे उपहागृहामध्ये देण्यात येणाऱ्या विविध पदार्थासोबत कांद्यासाठी स्वतंत्र दर आकरण्यात येत आहेत.
सध्या घाऊक बाजारात कांद्याला 6 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात कांदा 90 ते 100 प्रतिकिलो विकला जात आहे. त्यामुळे, गृहिणीबरोबरच खानावळ, उपहारगृह, छोट्या हॉटेलचालकांना कांदा काटकसरीने वापरावा लागत आहे. त्यामुळे, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील उपहारगृहे भेळ सेंटर, पावभाजी मिसळ विक्रेत्याकडे कांदा गायब झाल्याचे पहायला मिळत आहे. एरव्ही चार जणांचा भाजीसाठी एका कांद्याचा वापर केला जात असे आता मात्र अर्धाचा कांदा वापर करावा लागत आहे.
सध्या अनेक हॉटेलमध्ये नाष्ट्याबरोबर कांदा दिला जात नसून, काही ठिकाणी मिसळ सोबत अत्यंत कमी कांदा दिला जातो; पण तोंडी लावण्यासाठी काकडी मोठ्या प्रमाणात दिली जाते. त्यामुळे ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र, कांदा परवडतच नसल्याने अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानामध्ये कांदा मिळणार नसल्याचे फलकच लावून टाकले आहेत.
स्वस्तातील कांदा पाहिजे असेल तर ओला घ्या
अनेक ग्राहकांना 90 ते 100 रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांदा घेणे परवडत नाही. त्यामुळे ग्राहक कमी दरातील कांदा मागत आहेत. त्यावेळी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ओला कांदा दिला जात आहे. या ओल्या कांद्याचे दर अन्य कांद्याच्या तुलनेत काही प्रमाणात कमी आहेत.
कांद्याऐवजी कोबी आणि काकडीचा वापर
कांद्याच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका पाणीपुरी, चाटविक्रेत्यांना बसला आहे. या विक्रेत्यांनी कांद्याचा वापर कमी केला आहे. शेवपुरी, दाबेली, पावभाजीबरोबर आता जास्तीचा कांदा दिला जात नाही. सलाडमध्ये आता काकडी, गाजर व बीटचा वापर वाढला आहे. कोशिंबीरमध्ये केवळ काकडी व कांद्या ऐवजी कोबीचा वापर केला जात आहे.