राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – भोरगिरी (ता. खेड) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये हजर रहात नसल्याने लोकांची कामे होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे केली आहे.
भोरगिरी ग्रामस्थांनी यापूर्वी रुपेश मोरे हे डिसेंबर 2022 मध्ये याबाबत तक्रार केली होती, तेव्हापासून त्यांच्या कामात अद्याप फरक पडलेला नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामात अडचणी येत आहे. ग्रामसभा व मासिक मिटींगचे प्रोसिडींग लगेच लिहीले जात नाही. मागील ग्रामसभेचा वृत्तांत नागरिकांना वाचून दाखविला जात नाही. कामासाठी फोन केला तर उडवा उडवीची उत्तरे दिली जातात असे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची बदली न केल्यास भोरगिरी, भीमाशंकर आणि भिवेगाव ग्रामस्थांच्या वतिने पंचायत समितीच्या पुढे ग्रामस्थ उपोषणास बसतील अशा इशार्याचे निवेदन देत गटविकास अधिकार्यांना देण्यात आला आहे. निवेदन देते समयी संतोष काठे, रामदास सुपे, अनिल आंबेकर, शंकर लांघी, किसन विरणक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शासकीय नियोजन कोलमडते
भोरगिरी ग्रामपंचायतीमध्ये बारा ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर, भिवेगाव आणि भोरगिरी अशा तीन गावांचा समावेश आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर, भोरगिरी येथे अनेक भाविक पर्यटक येत असतात. त्यांच्यासह ग्रामस्थांच्या काही अडचणी सोडवण्यास ग्रामसेवक उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकर या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असल्याने तेथे ग्रामपमचायतीच्या वतीने सेवा सुविधा देण्यात अडचण होत असून शासकीय नियोजन कोलमडते आहे.