शौर्यदिनी देशभरातील बांधव नतमस्तक होणार : महसूल, पोलीस प्रशासन सज्ज
शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे असलेल्या भीमा नदीकाठी एक जानेवारी 1818 मध्ये इंग्रज व महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. त्यावेळी या युद्धामध्ये पाचशे बटालियन शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या तीस हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळविला होता. त्यामुळे कोरेगाव भीमा नदीकाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून विजय रणस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जातो. त्यामुळे बुधवारी (दि.1) कोरेगाव भीमा परिसरात लाखो भीम बांधवांचा भीमसागर उसळणार आहे.
कोरेगाव भीमा येथे विजय रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एक जानेवारो रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येतात. एक जानेवारी 2018 रोजी येथील शौर्याला दोनशे वर्षे पूर्ण होत असताना त्या ठिकाणी दंगल झाली. त्यामुळे मागील वर्षापासून शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, शासनाच्या वतीने दोन महिन्यांपासून नियोजन केले जात आहे. या मानवंदना कार्यक्रमासाठी दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याठिकाणी राज्य राखीव दलाच्या बारा तुकड्या, बाराशे होमगार्ड, घातपात विरोधी पथके, समता सैनिक दल, पोलीस मित्र असे दहा हजार सैनिक, चाळीस रुग्णवाहिका, पाच वरूण व पाच वज्र वाहने, तीनशे फिरते स्वच्छतागृहे, एकशे पन्नास खासगी व शासकीय बसेस, चाळीस व्हिडीओ कॅमेरे, तीनशे सीसीटीव्ही, 20 ड्रोन कॅमेरे, 16 क्रेन यांसह आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरेगाव भीमासह परिसरातील अनेक गावांमध्ये पोलिसांच्या वतीने संचालन करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या हिंसाचारानंतर शोर्य दिनाच्या दोन दिवस आधीपासून मोठ्या संख्येने भीम अनुयायांचे कोरेगाव भीमा परिसरात आगमन होत आहे. यावर्षी आठ ते दहा लाख भीम अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणार असल्याचा अंदाज शासनाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.