मागील काही दिवसांपासून शिवसेना कोणाची याबाबत मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. शिंदे गट आणि ठाकरे गट शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र काल निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. दरम्यान शिवसेनेचे भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुढील काही दिवसांत अंधेरी येथील विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. या निर्णयानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेच्या भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी म्हटले की, देशातील अनेक राज्यांमध्ये सत्तांतर झाले सरकार बदलले. मात्र राजकारणात कितीही विरोधक असले तरी असे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर कोणी कधी पेढे भरवले नाहीत.”
“राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्याअगोदर आमची भाजप सोबत २५ वर्षे मैत्री होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना पेढे भरवले. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढे का भरवले नाहीत. याच मला आश्चर्य वाटत आहे.” असे भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) म्हणाले.
त्याचबरोबर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनीही काल भाजपवर टीका करत एक ट्विट केले. ”आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही, डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही” मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू” अशा आशयाचे ट्विट अंधारेंनी केले होते.