तिरूअनंतपुरम – कॉंग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. या यात्रेमुळे भारत जोडो आणि कॉंग्रेस जोडो हे दोन्ही हेतू साध्य होतील असा विश्वास कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे. पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते आणि महिलांना कॉंग्रेस पक्षाचा आदर्श, मूल्ये आणि लोकांची सेवा करण्यासाठी एकजूट करण्याकरता ही यात्रा उपयुक्त ठरेल असे त्यांनी नमूद केले.
थरूर एका मुलाखतीत म्हणाले की संपूर्ण भारत एकजूट करू शकणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. जनता जर या भावनेने प्रेरीत झाली तर कॉंग्रेस पक्ष नक्कीच पुनरूज्जीवित होईल. दरम्यान, कॉंग्रेसने भारत जोडो नाही तर कॉंग्रेस जोडो अभियान राबवले पाहिजे असे मत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले होते.
आझाद यांच्याबाबत काही बोलण्यास थरूर यांनी नकार दिला. मात्र आझाद हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही. पण ही यात्रा देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आणि महिलांना जनतेची सेवा करण्यासाठी एकजूट करेल असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या हिताचे मुद्दे उपस्थित करून आम्ही त्यासाठी लढत आहोत हे यातून दाखवता येऊ शकते. त्यामुळे भारत जोडो व कॉंग्रेस जोडो हे दोन्ही उद्देश त्यातून साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची निवड झाली पाहिजे. आपण त्याचे स्वागत करतो असे सांगताना ते म्हणाले कोणत्या पक्षाच्या अध्यक्षांची निवड 10 हजार मतदार करतात?अनेक लोकांनी माझ्या निवडणूक लढवण्याचे स्वागत केले आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात विचारधारांच्या लढाईतील महत्वाचा टप्पा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.