नवी दिल्ली – भारत जोडो यात्रा लुधियानाला येण्यापूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेला विरोध दर्शवला आहे. एकीकडे पंजाबमध्ये यात्रेला मोठा पाठिंबा मिळत असतानाच दुसरीकडे अज्ञात व्यक्तींनी जिल्हा काँग्रेस भवन आणि परिसरात निषेधाचे पोस्टर लावल्याचे समोर आले. ज्यावर लिहिले आहे की, काँग्रेसने 1947 मध्ये देश तोडला आणि त्यानंतर 1984 मध्ये समाज तोडला आणि निरपराधांचे बळी गेले.
भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये दाखल होताच या यात्रेला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचा पाठींबा मिळताना दिसत होता. यात्रेदरम्यान राहुल गांधी नव्या पेहरावात देखील दिसून आले. परंतु काही अज्ञातांनी यात्रेला विरोध दर्शवत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी यावर ऍक्शन घेत परिसरातील सर्व पोस्टर हटवले व पोस्टर कोणी लावले असाइट याचा तपास सुरु केला आहे.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणा आधीच सतर्क आहेत. भारत जोडो यात्रेच्या सुरक्षेबाबत काँग्रेस पक्षाने यापूर्वीच सरकारला पत्र लिहिले असून, सरकारनेही यात्रेदरम्यान पूर्ण सुरक्षा ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी सकाळी परिसरातील लोकांनी लावलेली पोस्टर्स पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यावरून रात्री उशिरा परिसरात लोक झोपलेले असताना हे पोस्टर लावण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काँग्रेसने या कृत्याचा निषेध केला आहे तर पोलिसांनी पोस्टर काढून टाकत सर्वांना शांतत्याचे आव्हान केले आहे.