सुरक्षा नियम पालनाची करणार खात्री : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा निर्णय
पुणे – मालिका अथवा चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान निर्मात्यांकडून कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कामगार यांच्या सुरक्षा नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी केली जाणार आहे. यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने भरारी पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका मराठी मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान अनेक कलाकारांना करोनाची बाधा झाली. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने मालिका अथवा चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, याबाबत पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला. या पथकात महामंडळाच्या सदस्यांचा समावेश असणार असून, ही पथके दररोज चित्रिकरणस्थळी जाऊन पाहणी करतील.
‘ज्येष्ठ कलाकारांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी’
महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले म्हणाले, “करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता, चित्रिकरणासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही न्यायालयाने चित्रिकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी पालन होत नसल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या निर्मात्यांकडून नियमांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली जाणार आहे. सध्याची परिस्थिती बघता ज्येष्ठ कलाकारांनी शक्य तो चित्रिकरणाच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले.