1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस : भामा आसखेड धरणातून विसर्ग घटला
शिंदे वासुली, दि.12 (वार्ताहर) – खेडच्या पश्चिम भागात विशेषत भामखोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून नदीपात्रात केला जाणारा पाण्याचा 1 हजार 610 वरुन 805 क्युसेकपर्यंत विसर्ग कमी केला आहे. भामखोऱ्यात आणि धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत होता. धरण व परिसरात 1 जून पासून आतापर्यंत एकूण सुमारे 1 हजार 308 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणात पाण्याची आवक सतत वाढत होती. त्यानुसार धरण व्यवस्थापन विभागाने धरणाचे चार दरवाजे उघडून 2 हजार 346 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू केला होता. धरणक्षेत्रातील पर्जन्यमानानूसार पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत सुमारे 20 हजार क्युसेक केला होता. दरम्यान, भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या 17 गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. तसेच धरणाखालील नदीकाठच्या शेती, चाकण औद्योगिक वसाहत व चाकण शहराला पाणीपुरवठा योजनेलाही फायदा होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- गेल्या चार ते पाच दिवसांपासून भामखोऱ्यात व धरणक्षेत्रात फक्त 0.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाचा विसर्ग ही कमी केला आहे; परंतु पुढील काळात पाऊसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक होणार आहे.
– भारत बेंद्रे, उपविभागीय अधिकारी, भामा आसखेड धरण