नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाला उद्देशूनही एक बोचरे विधान केले. कॉंग्रेसचे आज काय झाले आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. दिल्ली ते पंजाबच्या दरम्यान कोणतीही आई आपल्या मुलाला एक होती कॉंग्रेस अशी अगदी लहान गोष्ट सांगू शकते अशी खोचक टिप्पणी मान यांनी केली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि या राज्यात त्या पक्षासोबत आघाडी करण्याची अनेक कॉंग्रेस नेत्यांची इच्छा नाही. परस्परांबद्दल संशयाचे वातावरण असतानाच आता मान यांचे एकप्रकारे कॉंग्रेसची खिल्ली उडवणारे विधान आले आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त्याने राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात पंजाब राज्याच्या चित्ररथाला यंंदा परवानगी मिळालेली नाही, त्या विषयावरून मान यांनी भारतीय जनता पार्टीवरही जोरदार टीका केली.
आमच्या शहीदांचा कसा सन्मान करायचा ते आम्हाला ठाऊक आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या ना हरकत प्रमाणपत्राची अर्थात एनओसीची आम्हाला आवश्यकता नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाला लाजपत राय, उधमसिंग, माई भागो, करतार सिंग सराभा, गदरी बाबे आणि महाराजा रणजीत सिंग यांचे बलिदान आम्हाला रिजेक्टेड कॅटेगिरीत पाठवायचे नाही. ते आमचे हिरो आहेत आणि त्यांचा आदर कसा राखायचा आम्हाला माहिती आहे.
ते पुढे म्हणाले की दिल्लीतील सोहळ्यासाठी आम्ही दोन रथ पाठवले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचा रथ दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे. आम्हाला वाटले जणू कोणती स्पर्धा सुरू आहे. आम्ही केवळ लाल किल्ल्यावरच का आमचा रथ दाखवायचा. मी स्वत: पूर्ण दिल्ली आणि पंजाबमध्ये रथ दाखवेन असे नमूद करताना त्यांनी चित्ररथ निवडीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेथे कोणाला बसवून ठेवले आहे माहिती नाही असे ते यावेळी म्हणाले.