बेंगळुरू – कर्नाटकातील शालेय अभ्यासक्रमात नीतिमत्तेचे धडे देण्यासाठी भगवत गीतेचा समावेश करण्याचा विचार केला जात आहे पण शिक्षण तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असे कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की गुजरात राज्यात असा प्रयोग केला जात आहे त्यावरून तशी संकल्पना राज्यातही राबवण्यावर विचार केला जात आहे. मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये नष्ट होत असल्याचा दावा करून मंत्री म्हणाले की, अनेकांनी नैतिक शिक्षणाची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, पूर्वी दर आठवड्याला नैतिक शास्त्राचा एक वर्ग असायचा, जिथे रामायण आणि महाभारताशी संबंधित विषय शिकवला जायचा.
आम्ही येत्या काही दिवसांत शालेय शिक्षणात नैतिक शिक्षण सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणार आहोत. पुढे जायचे ठरवले तर या अभ्यासक्रमाची सामग्री आणि वर्गाचा कालावधी याबद्दल शिक्षण तज्ञांशी चर्चा करू,असे नागेश म्हणाले. महात्मा गांधी यांच्या सारखे थोर राजकारणी भगवत गीता आणि रामायण महाभारताच्या शिकवणुकीपासून प्रेरणा घेत असत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे.
हिंदू धर्मग्रंथांमधील नैतिक मूल्ये अधोरेखित करताना, त्यांनी सांगितले की, या पुस्तकांमधील शिकवण ही प्राचीन भारतात आधुनिक शाळा आणि विद्यापीठे नसताना एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे एक मोठे साधन होते असेही त्यांनी म्हटले आहे. समाजावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या गोष्टींची ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, काय सुरू करायचे हे शिक्षणतज्ज्ञांवर सोडले जाईल, असे नागेश म्हणाले.