गेल्या काही दिवसांच्या कालावधीत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या अनेक भागांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते असो किंवा समाजकारणी असोत त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणाशी ना कोणाशी संवाद साधताना जी वादग्रस्त विधाने केली आहेत त्यामुळे वाद-विवाद निर्माण झाले. त्यानंतर एकंदर वातावरणच बिघडून गेले आहे. “उचलली जीभ लावली टाळ्याला’ ही म्हण खरी करणारे सध्याचे संवाद आहेत. विनाकारण क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
सोशल मीडियाच्या सक्रिय जगात असा एखादा वादग्रस्त विषय मिळाला की सोशल मीडिया वापरणारे कोणताही विधीनिषेध न बाळगता क्रिया-प्रतिक्रियांचा पाऊस पाडत असतात. त्यामुळेही सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका निर्माण होतो. साधारणपणे ज्या कार्यक्रमांमध्ये किंवा ज्या व्यासपीठावरून अशा प्रकारचे संवाद साधले जातात आणि त्यानंतर जे वाद निर्माण होतात तो मूळ कार्यक्रम किंवा मूळ व्यासपीठ कितीही चांगले असले तरी त्या कार्यक्रमाच्या उद्देशालाही हारताळ फसला जातो. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि प्रतिसादही मिळत असताना त्यांनी वि. दा. सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करून विनाकारण वाद ओढवून घेतला. राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेमुळे काही प्रमाणात हादरून गेलेल्या भाजपच्या नेत्यांना आपोआपच एक विषय मिळाला आणि त्यांनी ही संधी सोडली नाही.
महाराष्ट्रामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे आणि क्रिया-प्रतिक्रियांचे राजकारण सुरू झाले. साहजिकच या राजकारणामध्ये सावरकरांच्या जोडीने जवाहरलाल नेहरू आणि इतर नेते ओढले गेले. “तुम्ही आमच्या या नेत्यावर टीका केलीत आता आम्ही तुमच्या त्या नेत्यावर टीका करणार’ अशा प्रकारचे बालिश राजकारण गेल्या कित्येक वर्षांपासून देशात सुरू आहे. या वादामध्येसुद्धा तशाच प्रकारचे राजकारण बघायला मिळत आहे. हा मुद्दा राहुल गांधी यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी शेगाव येथील जाहीर सभेमध्ये सावरकर यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही. यातून त्यांची परिपक्तता दिसून आलीच. तसेच हा वाद जास्त वाढवायचा नाही हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले आहे. पण दुसरीकडे, सावरकरांचे वंशज असो किंवा सावरकरांना मानणारा जो वर्ग महाराष्ट्रात आहेत त्यांनी मात्र राहुल गांधी असो किंवा त्यांचे घराणे असो त्यांच्यावर टीका करण्याचे अद्याप थांबवलेले नाही. एका अनावश्यक संवादामुळे कशा प्रकारचा विसंवाद तयार होते याचे हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. हा वाद सुरू असतानाच महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमांमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असेच आक्षेपार्ह विधान केले आहे.
राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. दरवेळी त्यांच्या एखाद्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना पदावरून काढून टाकावे, ही मागणी जोर धरू लागते. यावेळीसुद्धा तशीच मागणी केली जात आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे. हा वाद आणि विसंवाद कमी होता म्हणून की काय भाजपचे प्रवक्ते त्रिवैदी यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अंगावर ओढवून घेतला आहे. कर्नाटकात टिपू सुलतानाच्या जयंतीवरून वाद-विवाद सुरू आहेत, तर दिल्लीमध्ये तुरुंगात असलेल्या “आप’च्या आमदाराला ज्या प्रकारे सुविधा पुरवल्या जात आहेत आणि त्यावरून वादविवाद सुरू झाले आहेत.
लोकशाहीमध्ये एखाद्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला सर्व माहिती असणे अभिप्रेत असते. त्यांना जी माहिती दिली जाते ती खरीच असते किंवा इतिहासाला धरून असते याची कोणतीही खात्री न करता त्यांनी जर त्या माहितीचा उपयोग सार्वजनिक कार्यक्रमात भाषणामध्ये केला तर अशा प्रकारचे वाद विवाद निर्माण होतात, अशा घटना आतापर्यंत अनेक वेळा घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या लोकशाही राजकारणामध्ये अस्मितांचा खेळ मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली झाल्यानेच कोणाची अस्मिता कधी दुखावली जाईल याची कोणतीच खात्री देता येत नाही. महान व्यक्तींवर टीका केल्यामुळे त्या व्यक्तीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची अस्मिता दुखावते. हे लोक ज्यांनी अशा प्रकारची टीका केली ते लोक ज्या नेत्याला मानतात त्याची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करतात. असाच खेळ गेले कित्येक वर्षे देशामध्ये सुरू आहे.
एखाद्या नेत्याच्या भूमिकेबाबत व त्याने घेतलेल्या निर्णयबाबत जी विधाने आज केली जातात त्या विधानांच्या भूमिकेचा संदर्भ खूप जुना असतो. मात्र जेव्हा त्या नेत्याने ती भूमिका घेतलेली असते तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे ती भूमिका घेतलेली असते, ही साधी गोष्ट अशी विधाने करताना नेहमीच विसरली जात असल्यानेच हा विसंवाद निर्माण होतो. सोशल मीडियावर नको इतके सक्रिय असणारे कार्यकर्ते आग भडकवण्याचे प्रयत्न करतच राहतात. गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांच्या किंवा समाजकारणी नेत्यांच्या विधानांमुळे जे विविध प्रकारचे वाद विवाद निर्माण झाले आहेत ते पाहता समाजाशी जोडले गेलेले राजकीय पक्ष, सामाजिक संघटना किंवा इतर काही संघटनांचे पदाधिकारी यांच्यासाठी इतिहासाची माहिती देणारा एखादा रिफ्रेशर कोर्स घ्यावा की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांसाठी आणि प्रवक्त्यांसाठी तुम्ही काय बोलावे आणि काय बोलू नये अशा प्रकारची आचारसंहिता जरी तयार केली तरी अशा प्रकारचे वाद कमी होऊ शकतात. एखादी गोष्ट लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद साधला जातो; पण अशा विसंवादामुळे जेव्हा लोकांची मने दुखावतात तेव्हा वाद निर्माण होतात. संवादानंतरचे विसंवाद सामाजिक स्वास्थासाठी योग्य नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची वेळ आता आली आहे.