तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक भावनिक घोषणा केली आहे. त्याबाबत…
वायएसआर कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर, तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक घोषणाच करून टाकली आहे. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत मला पुन्हा सत्तेवर न आणल्यास, ती माझी शेवटची निवडणूक असेल, असे त्यांनी सांगून टाकले आहे. चंद्राबाबूंच्या या नाट्यपूर्ण घोषणेमुळे कुणाला धक्का बसण्याचे कारण नाही. जनतेने आपल्याला व आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणावे, यासाठीच करण्यात आलेली ही गर्जना आहे. समजा ते सत्तेत आले नाहीत, तरी जनतेच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या “इच्छेमुळे’ ते आपल्या घोषणेपासून मागे जातील, यात शंका नाही.
एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीही राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही राजकारणातून निवृत्त होण्याचा इरादा बोलून दाखवला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर अलीकडच्या राजकारणात मन रमत नाही, यानंतर सामाजिक कामातच गुंतून राहावे असे वाटते, असा मनोदय बोलून दाखवला होता.
आंध्र प्रदेशातील करनूल जिल्ह्यात तेलुगू देसमचा एक रोड शो होता. त्या प्रसंगी बोलताना चंद्राबाबू म्हणाले, “मी आज विरोधी पक्षनेता आहे. मला तुम्हाला पुन्हा विधानसभेत पाठवायचे असेल, मी यापुढेही राजकारणात राहावे आणि राज्याच्या कल्याणाकरिता काम करावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या. तसे नसल्यास, मी काही 2024 नंतर पुन्हा निवडणूक लढवणार नाही.’ चंद्राबाबू हे आंध्रमधील लोकप्रिय असलेले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, हे खरेच आहे. चाळीस वर्षांतील राजकारणात त्यांचा कोणीही अपमान केला नव्हता. परंतु जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर चंद्राबाबूंचा विधानसभेत अवमान करण्यात आला. त्यांच्या पत्नीसही टार्गेट करण्यात आले. त्याचवेळी ही विधानसभा गौरवसभा आहे की कौरवसभा आहे, असा सवाल चंद्राबाबूंनी विचारला होता. काहीतरी अपमानास्पद बोल ऐकावे लागल्यानंतर चंद्राबाबूंच्या डोळ्यांत पाणीही आले होते. तेव्हाच तळापर्यंत जाऊन, लोकांमध्ये काम करून भरघोस मतांनी निवडून येईन. पक्षाच्या इतर उमेदवारांनाही विजय मिळवून देईन आणि विधानसभेचे रूपांतर पुनश्च: गौरवसभेत करेन, असा इरादा त्यांनी बोलून दाखवला होता.
2021 साली चंद्राबाबूंच्या पत्नीचा उल्लेख करून, वायएसआर कॉंग्रेसच्या सदस्यांनी त्यांचा अवमान केल्यानंतर चंद्राबाबू विधानसभेबाहेर पडले होते. माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले, असे सांगून ते पत्रकार परिषदेत ढसढसा रडले होते. सत्तेत येईपर्यंत मी पुन्हा विधानसभेत पऊल टाकणार नाही, अशी घोषणाही त्यांनी त्यावेळी केली होती. चंद्राबाबू हे एकसंध आंध्रचे मुख्यमंत्री होते आणि आंध्रचे विभाजन झाल्यानंतरही ते त्या पदावर राहिले होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द 14 वर्षांची आहे. सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसने तेलुगू देसमच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन टाकले आहे.
चंद्राबाबू हे 72 वर्षांचे असून, म्हातारबुवा, आता घरी बसा, असे शेरेही त्यांना ऐकून घ्यावे लागत आहेत. वास्तविक भारतात त्यांच्यापेक्षा वयस्क असे अनेक नेते विविध पदांवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील 72 वर्षांचेच आहेत. परंतु त्यांना कोणी निवृत्ती घ्या, असे सुचवत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन तर 79 वर्षांचे आहेत. चंद्राबाबू हे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून, त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक विरोधकांना असलेली व्यसने त्यांना नाहीत. अर्थात चंद्राबाबूंच्या या भाषणानंतर सत्तारूढ पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केला आहे. “चंद्राबाबू, तुम्ही जातीयवादी आहात. तुमच्या कारभारामुळे तुम्ही राज्याचे वाटोळे केले’, अशी टीका वायएसआरचे राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी यांनी केली आहे. इतर काहीजणांनी, “तुमचे कर्तृत्व काय?’, असा सवाल केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनी तेलुगू देसमचा दारुण पराभव केला.
वास्तविक चंद्राबाबूंना इकॉनॉमिक टाइम्स, इंडिया टुडे, टाइम एशिया अशा अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आंध्रचे आधुनिकीकरण करणे आणि तेथे आयटी क्रांती आणणे, यांचे श्रेय त्यांच्याकडे जाते. माहिती तंत्रज्ञानासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय गटाचे अध्यक्षपद चंद्राबाबूंकडे होते. अमेरिकेतील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटने 2000 साली त्यांना मानद प्राध्यापकपद देऊ केले होते. 2003 साली वाजपेयी सरकारने सूक्ष्म सिंचनासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय कार्यगटाचे अध्यक्षपद चंद्राबाबूंकडेच देण्यात आले होते. एवढेच कशाला, नरेंद्र मोदी सरकारने 2016 साली डिजिटल पेमेंट सिस्टिम्स आणि आर्थिक समावेशनासाठी तेरा मुख्यमंत्र्यांचा एक कार्यगट चंद्राबाबूंच्या अध्यक्षतेखाली तयार केला होता. त्यामुळे, ते कर्तृत्वशून्य आहेत, असे म्हणणे हा मूर्खपणा ठरेल. चंद्राबाबूंनी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, विद्यार्थी चळवळीत उडी घेऊन, आक्रमक नेता म्हणून नाव कमावले होते. 1975 साली ते भारतीय युवक कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्वरित संजय गांधी यांचे जवळचे समर्थक बनले. लोकसभेचे ज्येष्ठ सदस्य एन. जी. रंगा यांचा सहवास व मार्गदर्शनही त्यांना लाभले.
1978 साली चंद्रगिरी मतदारसंघातून वयाच्या केवळ 28व्या वर्षी चंद्राबाबू आमदार म्हणून निवडून आले. आंध्र प्रदेश लघु उद्योग विकास महामंडळाचे संचालक म्हणून आणि टी. अंजय्या यांच्या सरकारात सिनेमॅटोग्राफी खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. या खात्याचे मंत्री असतानाच त्यांचा चित्रपट अभिनेते एन. टी. रामाराव यांच्याशी संपर्क आला आणि 1980 साली त्यांनी रामारावांची कन्या भुवनेश्वरी हिच्याशी विवाह केला. पुढे एनटीआर यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली आणि यथावकाश चंद्राबाबूंचेच त्या पक्षात वर्चस्व प्रस्थापित झाले, हा इतिहास आहे. परंतु अजूनही चंद्राबाबूंमधील झुंजार वृत्ती संपलेली नाही, हे विशेष.