नवी दिल्ली – बांगलादेशात काही समाजकंटकांनी पॅसेंजर रेल्वे पेटवून दिल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली आहे.
जाळपोळीची ही घटना गेल्या महिन्याभरातील अशा प्रकारची पाचवी घटना आहे. मात्र जीवितहानी झालेली ही मोठी पहिलीच घटना आहे. राजधानी ढाकाकडे निघालेल्या मोहनगंज एक्सप्रेस या आंतरजिल्हा पॅसेंजर रेल्वेच्या ३ डब्यांना आज पहाटेच्या सुमारास समाजकंटकांनी ही आग लावली होती. ही राजधानीजवळच असलेल्या एअरपोर्ट रेल्वे स्थानकापासून थोडी पुढे आल्यानंतर ही आग लावली गेली होती, असे पोलिसांनी सांगितले.
काही प्रवाशांनी आग लागल्याचे बघितल्यानंतर ही रेल्वे पुढील तेजगाव स्थानकावर थांबवण्यात आली, असे तेजगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोहम्मद मोहसीन यांनी सांगितले. लोकोमोटिव्ह मास्टरने ट्रेन तेजगाव येथे थांबवली. तिथे अग्निशमन दलाच्या बचावकर्त्यांनी आग विझवली. त्यानंतर पेटलेल्या डब्यांमधून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले
या आगीमध्ये एक महिला आणि तिचे बालक मरण पावले. डब्यातून बाहेर काढलेल्या अन्य दोन मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. गेल्या आठवड्यात राजधानीच्या बाहेरील गाझीपूरमध्ये याच मार्गावरील लोहमार्ग उखडून टाकल्याने सात गाड्या रुळावरून घसरल्या होत्या आणि एक प्रवासी ठार झाला आणि डझनभर जखमी झाले होते. ऑक्टोबरच्या उत्तरार्धापासून डझनभर ट्रक, बस आणि खाजगी कार जाळण्यात आल्या, तर हिंसाचारात किमान सहा जणांचा मृत्यू झाला.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे आंदोलन
विद्यमान पंतप्रधान शेख हसिना या आगामी निवडणुकीतील पंतप्धानपदाच्या प्रमुख दावेदार आहेत. त्यांना माजी पंतप्धान बेगम खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडून विरोध होतो आहे. पुढील वर्षी ७ जानेवारीला होणार् या निवडणुकांपूर्वी हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बीएनपीच्यावतीने देशव्यापी आंदोलन केले जात आहे.