बीसीसीआयचा सर्व संघांना इशारा
मुंबई – आयपीएल स्पर्धेदरम्यान बायो-बबल सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून ती मोडून कोणीही बाहेर जाऊ नये, असा स्पष्ट इशारा बीसीसीआयने स्पर्धेतील सर्व संघांना दिला आहे.
स्पर्धेसाठी अमिरातीत दाखल झाल्यावर सर्व आठ संघांतील खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांची करोना चाचणी केली जाणार असून त्याचा आहवाल आल्यावर पुढील सूचना करण्यात येणार आहेत. मात्र, सर्वकाही अलबेल असले तरीही संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत संघातील खेळाडू व संबंधित कोणतत्याही व्यक्तीने बायो-बबल सुरक्षा भेजू नये अन्यथा अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही बीसीसीआयने दिला आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही संघ गुरुवारीच अमिरातीत दाखल झाले असून शनिवारपर्यंत सर्व संघ दाखल होणार आहेत. या सर्वांना तातडीने याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
बायो-बबल सुरक्षा भेदून एखादा खेळाडू बाहेर पडला व त्याला करोनाची लक्षणे दिसू लागली किंवा बाधा झाली तर त्याचा फटका सर्वांनाच बसेल इतकेच नाही तर स्पर्धेवरही त्याचा विपरीत परिणाम होईल. असे काही घडले तर कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही. या स्पर्धेदरम्यान सर्वांनाच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच अन्य काही मागणी असेल तर ती बीसीसीआयच्या प्रतिनिधीला सांगावी. मात्र, कोणत्याही कारणाने ठरवून दिलेल्या कक्षेतून बाहेर जाऊ नये, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. स्पर्धा सुरू झाल्यानंतरही आयपीएल समिती खेळाडूंची ठराविक दिवसांनी करोना चाचणी करणार आहे, असेही बीसीसीआयने सुचित केले आहे.