खेलरत्नच्या शिफारशीबाबत बीसीसीआय ट्रोल
मुंबई – देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा समजला जात असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी हिटमॅन रोहित शर्मा याचे नाव पाठवल्यानंतर देखील बीसीसीआयला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे. रोहितचा दर्जा इतक्या उशिरा समजला का, असे प्रश्न चाहत्यांनी सर्वोच्च संघटनेला विचारले आहेत.
शनिवारी बीसीसीआयने देशातील सर्वोच्च पुरस्कारासाठी रोहितच्या नावाची शिफारस केली होती. त्याचबरोबर शिखर धवन आणि महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यावरून आता टीकासत्र सुरू झाले आहे. गेल्या वर्षी देखील धवनच्याबाबतीत हाच घोळ घातला गेला होता. या खेळाडूंसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या शिफारसीवरूनही सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
त्याच्या नावावर आक्षेप नाही, पण मग दीप्ती शर्मासह महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाला का डावलले जात आहे. तिने गेल्या दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करूनही दुर्लक्ष का केले जात आहे, अशी विचारणाही चाहत्यांनी केली आहे.