मुंबई – मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाण याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अंकितवर लावण्यात आलेली बंदी अखेर बीसीसीआयने उठवली आहे.
आता त्याचा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 2013 साली झालेल्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अंकित दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती.
2013 सालच्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग उघडकीला आले होते. या प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या अंकित चव्हाण, एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी श्रीशांतवरील बंदी मागे घेतली गेली होती व त्यानंतर अंकितनेही बंदी मागे घेण्याची विनंती केली होती.