काटेवाडी – धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या नागरिकांनी काटेवाडी (ता. बारामती) येथे रास्ता रोको आंदोलन केले. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी बारामती येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास सर्व धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन या उपोषणामध्ये सर्व धनगर समाजाने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.
धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी काटेवाडी, ढेकळवाडी, मासाळवाडी, खाताळपट्टा, कण्हेरी, लिमटेक, पिंपळी तसेच परिसरातील सर्व धनगर समाजाने एकत्र येऊन काटेवाडी या ठिकाणी बारामती – इंदापूर रस्ता अडवून या रस्त्यावरती दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने काटेवाडी या ठिकाणी रास्ता रोको करून मोठमोठ्याने घोषणा देऊन आरक्षण हे धनगर समाजाला मिळालेच पाहिजे, यासाठीच हे रास्ता रोको करण्यात आला आहे. त्याचबरोबर या रास्ता रोकोचा उद्देश फक्त सरकारला जागे करण्यासाठी आहे. सर्वसामान्य जनता ही आपली सर्व जनता आहे, या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे. रास्ता रोको जरी केला असला तरी हा रस्ता रोको शांततेच्या मार्गाने करण्यात आला होता. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उग्रपणे आंदोलन करू नये, अशा प्रकारे आवाहन यावेळी करण्यात आले.
रस्त्यावरती धावणाऱ्या एसटी बस त्याचबरोबर इतरही सर्व वाहने शासकीय असल्याने ते आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून घेतलेले असतात. जर या सर्व गोष्टींची हानी झाली तर ही सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून झालेली हानी असेल. त्यामुळे धनगर समाजाला फक्त अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गरज आहे व ती गरज पूर्ण होण्यासाठी सरकारने धनगर समाजाकडे लक्ष देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केले आहे.
या आरक्षणामुळे धनगर समाजातील मुला – मुलींना शिक्षणाबरोबर नोकरीमध्ये देखील लाभ मिळणार आहे. परंतु आत्तापर्यंतच्या काळात विचार केला तर सरकार मात्र या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उदासीनता दाखवत आहे. व ही वदासीनता मोडून काढण्यासाठीच धनगर समाजाच्या वतीने काटेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाज एकत्र येऊन रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी काटेवाडी पासून पिंपळीपर्यंत व काटेवाडी पासून सणसरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी धनगर समाजाच्या नागरिकांनी एकच भूमिका घेतली की, शांततेच्या मार्गाने धनगर समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. धनगर समाजाचे आंदोलन हे फक्त समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आहे, याचा विचार सरकारने करावा, परंतु जर का सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तत्परता दाखवली नाही तर धनगर समाज यापुढे मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन छेडणार आहे, याची दखल शासनाने घ्यावी, असा इशारा देण्यात आला.