म्हसवड, (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने बैठक घेऊन, मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने, धनगर समाजातील तरुणांनी म्हसवड, ता. माण येथे गेल्या 15 दिवसांपासून सुरू केलेले उपोषण स्थगित केले. धनगर समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बबन वीरकर आणि दीपाली वीरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उत्तम वीरकर, जयप्रकाश हुलवान यांनी उपोषण सोडले.
उपोषणकर्ते गणेश केसकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हे तीन तरुण पालिका कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून उपोषणास बसले होते. धनगर समाजाचा एसटी संवर्गात समावेश आहे; परंतु ‘धनगड’ऐवजी ‘धनगर’ अशी दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. धनगर समाजाचे युवा नेते बालाप्रसाद किसवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, उपोषण आंदोलकंशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा घडवून आणली. आरक्षणाचा प्रश्न सोडवायला राज्य सरकार तयार आहे.
या संदर्भात मुंबईत तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपोषण सोडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. किसवे यांना बैठकीची तारीख व वेळ देत असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी मु्ख्यमंत्र्यांनी किसवे यांना मुंबईतून म्हसवडला पाठवले. अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार विकास अहिर, म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्यासमवेत किसवे यांनी उपोषणकर्ते आणि धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून, उपोषण थांबवण्याची विनंती केली.
यावेळी बबन वीरकर, डॉ. प्रमोद गावडे, दादासाहेब दोरगे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब काळे, अशोक राजगे, आप्पासाहेब पुकळे, तुषार वीरकर, बाबासाहेब माने, पोपट रुपनवर, डॉ. सुरेश मासाळ उपस्थित होते. ओबीसी नेते सोमनाथ काशीद, कुणबी नेते रणजित भाकरे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. गावडे यांनी त्यांचे आभार मानले.
या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अनुराधा देशमुख, उत्तमराव जानकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल माण, खटाव, आटपाडी, माळशिरस आदी तालुक्यांमधील धनगर बांधव आणि भगिनींचेही आभार मानले.