-गायत्री वाजपेयी
हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेली सर्वात मोठी पर्वतरांग म्हणजे पिरपंजाल पर्वतरांग. काश्मीर खोऱ्याला जम्मूतील पुंछ आणि रजोरी या जिल्ह्यांना जोडणाऱ्या पिरपंजाल पर्वतरांगमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे कृष्णा घाटी.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक कोर्सच्या निमित्ताने कृष्णा घाटीतील सैन्यदलाच्या तळाची भेट घेण्याची संधी मिळाली होती. पुण्यातून मी आणि माझा मित्र या कोर्समध्ये होतो. त्यावेळी गणेशोत्सव सुरू होता. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करून केवळ एक महिना झाला होता. घाटीतील त्या दुर्गम भागातील सैन्याच्या एका किल्ल्यासमान तळावर अतिशय सुबकपणे सजावट करत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
आम्ही मुक्कामी होतो, ते ठिकाण कृष्णा घाटीपासून सुमारे तीन-चार तासांच्या अंतरावर होते. सकाळी आठ वाजता आम्ही कृष्णा घाटीकडे निघालो, पाच वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही 30 जण आणि ताफ्याच्या पुढे दोन आणि मागे एक अशा तीन लष्कराच्या गाड्या. असा आमचा ताफा रजोरीच्या रस्त्यावरून मार्गस्थ होत होता.
घाटीचा प्रदेश हा संवेदनशील भाग असल्याने या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी नाही. इतकेच नव्हे तर या भागामध्ये सैन्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांची माहिती कोणाला कळू नये, यासाठी अतिशय काटेकोरपणे निगराणी केली जाते. घनदाट जंगलातून जाणारा वळणावळणाचा रस्ता अनेकदा सह्याद्रीच्या घाटांची आठवण करून देत असे, पण याठिकाणी असलेली भयानक शांतता आणि एकटेपण तेथील गंभीरतेची जाणीव करून देत होता.
जंगलातील हा “सिक्रेट’ रस्ता पार करून दुपारी दोन वाजता आम्ही घाटीतील सैन्याच्या तळावर पोहचलो. येथे प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला सेक्युरिटी चेकला सामोरे जावे लागते. याठिकाणी पोहोचल्यावर तुकडीच्या प्रामुखाने ज्याला कमांडिंग ऑफिसर म्हटले जाते त्याने आमचे स्वागत केले. स्वागताची औपचारिकता आणि सूचनांचा भडिमार झाल्यानंतर आम्ही त्या तळाची पाहणी करण्यासाठी पुढे जाऊ लागलो. साधारण 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर थोडा सपाट प्रदेश होता.
याठिकाणी डाव्या बाजूला एक छोटीसी खोली होती. त्याठिकाणी रंगीबेरंगी झुरमुळ्या, तोरण, लाइटच्या माळा यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती आणि मधोमध बाप्पाची सुंदर मूर्ती विराजमान होती. गणेशोत्सव सुरू असतानाही बाप्पाचे एकदाही दर्शन झाले नाही. याची रुखरुख कृष्णा घाटीतील बाप्पाच्या दर्शनाने एकदम नाहीशी झाल्याचा अनुभव मी घेतला. एकीकडे कृष्णा घाटीसारखा एक महत्त्वाचा प्रदेश पाहण्याची संधी आणि याठिकाणी लाडक्या बाप्पाचे अचानकपणे झालेले दर्शन एक सुंदर योगायोगच होता. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे पाहणीसाठी गेलो. जवळच सैन्याचे हेलिपॅड होते.
ही जागा म्हणजे समोरील टेकडीवर पाकिस्तानी सैन्याच्या तळाच्या समोर एकदम 90 अंशात होती. अतिशय सहजपणे दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकतात अशी ही जागा. त्यानंतर आम्ही तळावरील त्यांच्या सर्वेलन्स रूममध्ये गेलो. त्याठिकाणी सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला कृष्णा घाटीतील सैन्यांच्या कामकाजाबाबत माहिती दिली. या संपूर्ण भागात सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले आहेत. शत्रूप्रदेशालगत भूसुरुंग पेरलेले आहेत.
परिसरातील विविध टेकड्यांवर सैन्याचे छोटे छोटे बंकर आहेत. सैन्याची घातक तुकडी, स्नाइपर्स आणि सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणारे सैनिक अशी मोठी व्यवस्था याठिकाणी ठेवण्यात आली आहे. यावरूनच सैन्य दलासाठी हा प्रदेश किती महत्त्वाचा आहे याची जाणीव होते. कृष्णा घाटीवर ताबा मिळविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. 1965, 1971 असो की कारगिल युद्ध प्रत्येकवेळी हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न शत्रूसैन्याने केले आहेत. पण प्रत्येकवेळी भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर देत, रिकाम्या हाती परतवले आहे. याच इर्षेतून सतत खुसपट काढण्याचा प्रयत्न ते करत असतात. आजही याठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी, शस्त्र संधीचे उल्लंघन करण्याच्या घटना घडतात अशी माहिती जम्मूतील सैन्याचे प्रवक्ते आणि आमच्या जम्मू भेटीचे समन्वयक कर्नल देवेन्द्र आनंद यांनी सांगितले.
या भेटीची एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, कृष्णा घाटीतीलच अजून एका तळावर आम्ही भेट दिली होती. त्याठिकाणी आम्ही रात्री पोहोचलो होतो. एकामागोमाग एक जाणाऱ्या गाड्या पाहून, भारतीय सैन्याची काहीतरी मोठी हालचाल सुरू असल्याचा समज झाल्याने त्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्याच्या तळावर जोरदार मारा करण्यात आला होता. यातील काही भाग आम्ही स्वतः अनुभवला होता. एकूणच कृष्णा घाटीची ती भेट प्रत्येक अंगाने एक अविस्मरणीय अनुभव होता.
या घाटीची सुरक्षा ज्या मराठा तुकडीकडे आहे त्यामध्ये सातारा, चंद्रपूर, बेळगावचे बरेच तरुण आहेत. देशसेवा करताना विघ्नहर्ता नेहमी आपल्या पाठीशी आहे, ही भावना त्यांच्याशी बोलताना जाणवली आणि बाप्पा त्यांची नेहमी रक्षा करो अशी प्रार्थना नकळतपणे केली जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त त्या अविस्मरणीय भेटीची पुन्हा एकदा झालेली आठवण.