जिल्ह्यातील 15 हजार प्रचारसाहित्य हटविले
नगर – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या 72 तासात अर्थात तीन दिवसांत राजकीय बॅनर, सरकारी कोनशिला, यासह सरकारी फलक झाकण्याबरोबरच झेंडे हटविण्याच्या एकूण 14 हजार 748 कार्यवाही करण्यात आल्या आहेत. मात्र,आचरसंहिता भंगाची जिल्ह्यात अद्याप एकही तक्रार आली नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
शासकीय जागेतील, सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागेतील व खाजगी मालकीच्या जागेतील हे साहित्य हटविण्यात आले आहे. अकोल्यात 789, संगमनेरमध्ये 3738, शिर्डी, राहातामध्ये 626, कोपगरगावमध्ये 1068, श्रीरामपूरमध्ये 0, नेवासामध्ये 1089, शेवगावमध्ये 884, राहुरीमध्ये 4, पारनेरमध्ये 1323, नगर शहरात 3845, श्रीगोंद्यात 430, तर कर्जत-जामखेडमध्ये 747 ठिकाणी ही कार्यवाही झाली आहे.
दोन मतदारसंघासाठी एक निरिक्षक
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यात प्रत्येकी दोन मतदारसंघासाठी एक निरिक्षक नियुक्त केले असून यातील शेवगाव-पाथर्डी आणि राहुरी मतदारसंघासाठी ओडीसा राज्यातून सुरेश दलाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान कर्मचारी-प्रतिनिधींना लवकरच प्रशिक्षण
मतदान प्रक्रिया पाडणारे केंद्र अधिकारी आणि अन्य चार कर्मचारी अशा जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील राखीवसह 18 हजार जणांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. यासह राज्य आणि केंद्रीय पातळी ज्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झालेले आहेत. त्यांनाच निवडणूकीच्या प्रक्रियेत ठेवण्यात येणार आहे. प्रशिक्षण नसणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील निवडणुकीच्या कामातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पाडताना तांत्रिक अडचण येवू नयेत, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर मतदारांचा, सर्वसामान्यांचा विश्वास कायम राहावा, यासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आदेशानंतर मतदान यंत्रे मतदारसंघात
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हास्तरावर ठेवण्यात आलेली मतदान यंत्रांचे रॅन्डेमाईजेशन (सळमिसळ) करण्यात येणार आहे. या रॅन्डेमाईजेशननंतर कोणते यंत्रे कोणत्या मतदारसंघात पाठवाचे हे ठरविण्यात येणार असून मतदसंघात गेल्यावर पुन्हा रॅन्डेमाईजेशन करण्यात येणार असून त्यानंतर हे यंत्र मतदान केंद्रापर्यंत पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानूसारच होणार आहे. दोन दिवसापूर्वीच ही यंत्रे निवडणूक शाखेकडे आली आहेत.
उमेदवाराच्या प्रेमात कार्यकर्ता येणार अडचणीत!
आचारसंहितेची अंमलबजावणी व नियम अधिकाधिक कडक केले जात आहेत. जर एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या उमेदवार नेत्याचा प्रचार बोर्ड परवानगी घेवून लावला तरी तो खर्च उमेदवाराच्या खर्चात ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे सदर उमेदवाराने या बोर्डाची जबाबदारी झटकली तर संबंधित कार्यकर्त्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी लग्नपत्रिकेत उमेदवाराचे नाव छापल्यामुळे नवरदेवावरच पारनेरमध्ये कारवाई झाली होती. त्यामुळे उमेदवारावरील अती प्रेम कार्यकर्ते उतू जाताना सावध राहतील हे नक्की!